इंधन दरवाढ विरोधात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली 

इंधन दरवाढ विरोधात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची सायकल रॅली 

 

 कराड / प्रतिनिधी

 

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी कराड येथे कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, कराड दक्षिण युवक काँग्रेस व कराड शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभीवादन करून सायकल रॅलीची सुरुवात केली. हि रॅली पुढे येऊन दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे जाऊन भेदा चौक मार्गे शहरातील पोपटभाई शहा पेट्रोल पंपावर समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, ज़िल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेस चे अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा काँग्रेस कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूर नगरसेवक राजेंद्र यादव (आबा), कराडचे माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, प्रा. धनाजी काटकर, सतीश पाटील, शिवाजी जाधव, दिलीप देशमुख,  मोहन शिंगाडे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, कराड दक्षिण युवक चे अध्यक्ष अमित जाधव, कोळे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत चव्हाण आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

 यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे, महागाई च्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकार ने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाई चा डोंगर सामान्य जनतेसमोर उभा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून ज्यादा पैसे सामान्य जनतेकडून उकळत आहे व याचे त्यांना काहीही सोयरसुतक दिसत नाही. आज इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर सायकल रॅली आयोजित करून निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच स्वाक्षरी मोहीम सुद्धा शहरी भागातील पेट्रोल पंपावर घेण्यात आली आहे. सर्व सामान्य जनतेचा रोष काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे व या आंदोलनातून आमची मोदी सरकारला मागणी आहे कि इंधनाचे दर तातडीने कमी करावेत. आज मोदी सरकारला सर्व पातळ्यांवर अपयश येताना दिसत आहे पण यातून मार्ग काढण्या ऐवजी मोदी सरकार जनतेचीच परीक्षा घेत आहे. व हे सर्व निंदनीय आहे.