टेंभू धरणबाधितांना जमिनीचा मोबदला न दिल्यास जलसमाधी - सचिन नलवडे

टेंभू धरणात गोवारे, सैदापुरमधील शेतकर्यांच्या नदीकाठच्या जमीनी पाण्याखाली गेल्या आहेत. याप्रश्नी येत्या आठ दिवसात बैठक घेऊन संबंधितांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु न केल्यास बाधित शेतकर्यांसह टेंभू धरणात जलसमाधी घेणार

टेंभू धरणबाधितांना जमिनीचा मोबदला न दिल्यास जलसमाधी - सचिन नलवडे
ओगलेवाडी : टेंभू उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना सचिन नलवडे व सैदापुर येथील धरण बाधित शेतकरी

टेंभू धरणबाधितांना जमिनीचा मोबदला न दिल्यास जलसमाधी - सचिन नलवडे 

कार्यकारी अभियंत्यांना निवेदन : 13 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मागणी 

कराड/प्रतिनिधी : 

       टेंभू धरणामुळे तालुक्यातील गोवारे, सैदापुर येथील शेतकर्‍यांच्या कृष्णा नदीकाठच्या जमीन पाण्याखाली गेल्या आहेत. बारा वर्षांपासून त्यांना याबाबतचा कोणताही मोबदला मिळालेला नाही. याप्रश्नी जर येत्या आठ दिवसात बैठक घेऊन संबंधितांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु न केल्यास बाधित शेतकर्‍यांना सोबत घेऊन टेंभू धरणात जलसमाधी येणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिला आहे.

        याबाबत गोवारे, सैदापुर येथील बाधित शेतकर्‍यांनी सोमवारी ६ रोजी टेंभू उपसा सिंचन विभाग, ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांना निवेदन दिले आहे. यावेळी राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शितल पवार आदी. शेतकरी उपस्थित होते.

       या निवेदनात म्हटले की, टेंभू येथे कृष्णा नदीवर 2008 साली धरण बांधण्यात आले. यामध्ये गोवारे, सैदापुर, मलकापूर या गावातील शेतकर्‍यांची नदीकाठची जमीन गेल्या बारा वर्षापासून पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न बुडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. धरणाची भुसंपादन प्रक्रिया सुरु झाल्यापासून अनेक वेळा या शेतकर्‍यांनी टेंभू जलसिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली आहेत. परंतु, येथील अधिकार्‍यांनी त्यास केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. तसेच गोवारे येथील शेतकर्‍यांच्या जमीनी खरेदी करण्यासाठी 2017 साली वर्तमानपत्रामध्ये कृष्णा खोरे महामंडळाने खरेदी पूर्व नोटिसही दिली होती. तरीही आजपर्यंत शेतकर्‍यांच्या जमीनेचे संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही.

      त्यामुळे धरण बाधित शेतकर्‍यांनी आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन परत द्या, अन्यथा सदर जमिनीचा मोबदला तरी द्या, असा पवित्रा घेतला आहे. याची दखल घेऊन यासंदर्भात येत्या सोमवारी 13 रोजीपर्यंत निर्णय न झाल्यास बाधित शेतकर्‍यांसह सहकुटुंब टेंभू धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच त्यांनतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी टेंभू धरण व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.