सह्याद्रि कारखाना निवडणूक; २५१ पैकी २०५ अर्ज वैध, २९ अर्ज अवैध झाल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवार (दि. ६) रोजी निवडणूक कार्यालयात पार पडली. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या २५१ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज दुबार असल्याने त्यांसह अन्य १२ अर्ज झाले आहेत. त्यामुळे एकूण अर्जांपैकी २०५ अर्ज वैध ठरले आहेत. तर मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जांवर घेण्यात आलेल्या हरकतींवर झालेल्या तपासणी आणि सुनावणीत सदरचे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी शुक्रवारी दिली. या निकालामुळे सत्ताधारी व विरोधी गटासाठी हा जोरदार धक्का असल्याचे बोलले जात आहे.
सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी विक्रमी १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची छाननी गुरुवारी निवडणुक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत झाली. गटनिहाय करण्यात आलेल्या अर्जाच्या छाननीत सुरुवातीला दुबार भरण्यात आलेले १७ उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यानंतर कागदोपत्री अपुर्तता व अन्य कारणांमुळे १२ बाद झाले.
दरम्यान, दाखल अर्जांची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर, तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावनी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये मानसिंगराव जगदाळे व निवासराव थोरात यांच्या बाजूने त्यांच्या-त्यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. त्यानंतर या सुनावणीचा निर्णय रात्री उशीरापर्यंत जाहीर करण्यात आलेला नव्हता. अखेर शुक्रवार (दि. ७) रोजी निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी हरकती घेतलेले मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांचेही अर्ज बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती दिली. त्यामुळे कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक, कारखान्याचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे आणि विरोधी गटाचे प्रमुख उमेदवार असलेले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक निवासराव थोरात यांचे अर्ज बाद झाल्याने दोन्हीही गटासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.