पाटणकरांच्या भाजपप्रवेशाला
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त !
कृष्णाकाठ / अशोक सुतार
महाराष्ट्रातील राजकारणात स्वत:चा दबदबा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज २६ वर्षांचा झाला आहे. पक्षाचा वर्धापन दिन आज होत आहे, याचा आनंद आहे, परंतु एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पाहायला मिळत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे पूर्वाश्रमीचे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते होते. महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत शरद पवारांनी २६ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यामुळे राष्ट्रीय राजकारणाचे मोठे नुकसान झाले, एका भावी पंतप्रधानाला महाराष्ट्र मुकला. असो. काला तस्मै नम: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह, १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) घड्याळ हे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाली आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवातीपासून प्रफुल्ल, पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, बाळासाहेब पाटील, अजित पवार, आर.आर. पाटील, छगन भुजबळ, जयंतराव पाटील आणि पाटणचे तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर हे शिलेदार होते. महाराष्ट्रात या पक्षाने नंबर १ चा पक्ष म्हणून गौरव मिळवला होता. पक्ष स्थापनेनंतर २५ वर्षांनी नेत्यांच्या अतीव महत्वाकांक्षेपोटी या पक्षाची दोन शकले झाली. त्यातील एक पक्ष आहे तो, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (महाविकास आघाडी संलग्न ) आणि दूसरा पक्ष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (महायुती संलग्न ) होय.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पूर्वीपासून एकनिष्ठ म्हटले जातात. परंतु विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव व सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, मंगळवार दि. १० जूनला म्हणजे ज्या पक्षात पूर्वी सत्यजित सिंह पाटणकर होते, त्या पक्षाच्या वर्धापनदिनी ते मुंबईत प्रदेश कार्यालयात होणार्या कार्यक्रमात भाजपामध्ये जाणार आहेत. किंबहुना भाजपला हाच मुहूर्त पाटणकरांच्या पक्षप्रवेशाला मिळाला असावा, असे वाटते. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सातारा जिल्ह्यात भाजपाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्यजितसिंह पाटणकर यांच्या रूपाने हा देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पाटणकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे जिल्ह्यासह पाटणच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे हमखास दिसून येते.
अस्मितेपासून पक्षफुटीकडे प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी १० जून १९९९ रोजी या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ (संयुक्त पुरोगामी आघाडी) मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता. इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय ? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. दि. २० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित केले. पराभूत झाल्यानंतर त्यांना पक्षात न घेतल्याने त्यांनी एनपीपी हा राष्ट्रवादीसदृश नवा पक्ष स्थापन केला होता. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपाशी संधान बांधून २०२४ साली म्हणजे गत वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते सोबत घेऊन स्वत: चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्थापन केला. विशेष म्हणजे न्यायालयात हा वाद गेला असता, न्यायालयाने अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्ष म्हणून संबोधले होते. अजित पवार यांनी भाजपशी सलगी करीत महायुतीमध्ये आपल्या पक्षाचा शिरकाव करून उप मुख्यमंत्रीपद स्वत: कडे घेतले.
पाटणकरांचा भाजपप्रवेश म्हणजे शंभुराजांची डोकेदुखी
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना गत वर्षी विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाटण विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडला होता. महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत सत्यजितसिंह पाटणकर यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून सत्यजितसिंह पाटणकर हे राष्ट्रवादी शरद पवार गट सोडणार असल्याच्या चर्चा वारंवार सुरू होत्या, अखेर या चर्चा खर्या ठरत आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांचे काही दशकांपासून पाटण पंचायत समितीसह विविध संस्थांवर व सहकारी संस्थांवर वर्चस्व राहिले दिसून येते. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चेहराच राहिलेला नाही. जो पक्ष विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्यात उर्जितावस्थेस आणला, त्याची यापुढे तालुक्यात कदापि चर्चा होणार नाही असे दिसते. त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे. तसेच दुसरी बाब म्हणजे पाटणकरांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे विद्यमान ना. शंभुराज देसाई यांच्यासाठी ही नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. भाजप पक्ष सत्यजितसिंह पाटणकरांना यापुढे शक्ती देणार असून त्याचे परिणाम लवकरच पाटण तालुक्याच्या राजकरणात दिसून येतील.
पाटण तालुक्यात भाजपला येणार अच्छे दिन !
पाटण विधानसभा मतदारसंघावर सन २०१४ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे. पाटणकर घराणे हे मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न, भाजपने पाटणकरांच्या पक्ष प्रवेशानिमित्त केलेला दिसत आहे. गेली काही वर्षे पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपाकडे एकही लक्षात राहण्यासारखा राजकीय चेहरा नव्हता आणि त्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद कमी झाली. मात्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निर्णयामुळे पाटण तालुक्यात भाजपाला चांगले दिवस येणार असल्याचे दिसत आहे. भाजपचे यापुढे पाटण तालुक्यात विशेष लक्ष रहाणार आहे.