कराड
मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. उपोषणाचा १० वा दिवस असूनही प्रशासन दखल घेत नसल्याने समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे सांगत काले ता.कराड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. तरीही शासन केवळ आश्वासने देत असून ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.
यावेळी समाजाने ८ प्रमुख मागण्या केल्या आहेत. हैदराबाद, सातारा, औंध व इतर गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे. मराठा समाजाला टिकणारे व कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण लागू करावे. सगेसोयरे अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.
कुणबी नोंदी व प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा. आंदोलनादरम्यान समाजबांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी उपाययोजना राबवाव्यात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा तातडीने द्यावा.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन शासनाने २ दिवसात सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी काले येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





