दोन संशयित ताब्यात;जादा गुणांच्या आमिषाने फसवणूक
विटा/प्रतिनिधीः-
नीट ’ परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय) ताब्यात घेतल्याचे समजते. त्या दोघातील एक संशयित खानापूर तालुक्यातील विटा परिसरातील असून पथकाने छापेमारी करत त्याला ताब्यात घेतल्याचे समजते. यामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
घोटाळाप्रकरणी आता सांगली कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर माहिती अशी की, सीबीआयने 9 जूनला याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ’ नीट’ यूजी -2025 ’ परीक्षेतील कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालकांकडून मोठी रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सीबीआयने आता तांत्रिक तपास सुरू केला आहे. यात दोघा संशयितांची नावे समोर आली आहेत. संशयितांनी अनेक विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहेत. त्यानुसार सीबीआयने दोघांची माहिती काढली. त्यानुसार मुंबई आणि सांगलीत छापेमारी करण्यात आली.
सांगलीतील एकाला रात्री ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते. यातील एका संशयिताने प्रत्येक विद्यार्थ्यामागे प्रत्येकी 90 लाखांची मागणी केली होती. निकाल जाहीर होण्याच्या सहा तास आधी त्यांना वाढलेल्या गुणांची माहिती मिळेल, असे आश्वासन दिले होते, तर सांगलीतील संशयित एक शिक्षण संस्थेच्या संबंधित असल्याचे समजते. दोघांच्या मोबाईलची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली असता, संभाव्य उमेदवारीची यादी, त्यांचे पट क्रमांक, प्रवेश पत्र, ओ एम आर शीट, तसेच आर्थिक व्यवहाराचे पुरावे सापडले असल्याचे समजते. संशयिताला लवकरच सीबीआयच्या मुंबई येथील न्यायालयात हजर करणार असल्याचे समजते. याप्रकरणी सोलापूर व नवी मुंबई येथील सशयितांची नावे समोर आली आहेत.
दरम्यान, सीबीआयच्या छाप्यात कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा ’ कर्मचारी याचा सहभाग आढळला नसल्याची माहिती तपासून पुढे येत आहे. सद्य: स्थितीत आर्थिक व्यवहारांची तपासणी करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शोध घेत जात आहे. या घटनेची खानापूर तालुक्यात व विटा शहरात चांगली चर्चा रंगली आहे.