कृष्णाकाठ /अशोक सुतार दि. २५ जून २०२५
झारीतील शुक्राचार्य
जेव्हा आपल्यातीलच एक माणुस (स्वकीय) ऐन मोक्याच्या क्षणाला अचानक बंडखोरी दाखवुन कामात अडथळे निर्माण करतो, तेव्हा अशा व्यक्तीला मराठी समाजात ‘झारीतील शुक्राचार्य’ असे म्हणतात. आता राज्य सरकार प्रत्येक विभागाला खर्च करण्यासाठी निधी देत असते. ग्रामीण भागात अनेक योजना, उपक्रम यशस्वी होत नाहीत, असेच बर्याचवेळा दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे झारीतील शुक्राचार्य होय. शुक्राचार्यांशी संबंधीत मराठी म्हणीमध्ये ज्या वस्तुचा उल्लेख आहे, त्या वस्तुला झारणी नव्हे तर झारी म्हणतात. झारणी म्हणजे एखाद्या मोठ्या परातीच्या आकाराची चाळण तर झारी म्हणजे जुण्या काळातील (सोंड असलेला एक प्रकारचा) कमंडलु किंवा मग आजच्या काळातील चहाच्या गाळ्यांवरील चहाची कीटली. महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला व मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण, संगणक शिक्षण, समुपदेशन केंद्र, वसतिगृह, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र, यातील बहुतांश योजना आणि त्यावर होणारा खर्च केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पुरवण्यात येणार्या शैक्षणिक आणि पौष्टिक साहित्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अनेक प्रकल्प अधिकारी लाखो रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवतात, परंतु प्रत्यक्षात हे साहित्य अंगणवाड्यांपर्यंत पोहोचतच नाही. धक्कादायक बाब म्हणजे, साहित्य न देताच अंगणवाडी सेविकांकडून पावत्यांवर सह्या घेतल्या जात आहेत. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये साधे स्टॉक बुकही उपलब्ध नसल्याने, या भ्रष्टाचाराला आणखी खतपाणी मिळत आहे.
महिला व बालकांच्या विकासासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधीत केवळ कागदोपत्री खरेदी दाखवून, बोगस बिलांच्या आधारे लाखो रुपयांचा मलिदा लाटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ज्या विभागावर महिला आणि बालकांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, त्या महिला व बाल कल्याण विभागात काही जणांनी संगनमताने स्वतःचा आर्थिक विकास साधल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाचा केवळ देखावा करणार्या सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. ही बातमी वाचत असताना झारीतील शुक्राचार्याची आठवण झाली. हे झारीतील शुक्राचार्य समाजाला घातक ठरत आहेत, असेच दिसते.
हिंदु पुराणात एक कथा आहे. या कथेत दैत्यराज बळी राजा, विष्णुचा बटु अवतार वामन अवतार आणि दैत्य राजगुरु शुक्राचार्य यांचा उल्लेख आहे. ब्राम्हणाच्या रुपात आलेला बटू हा साधारण मनुष्य नसुन हा वेश बदलुन आलेला विष्णुअवतार आहे, हे अंतर्ज्ञानाने ओळखल्यावर शुक्राचार्यांनी बळीला या ब्राम्हणपुत्रास दान देण्यापासुन रोखले. परंतु ‘जर मी दान करण्यास नकार दिला तर माझी दानी राजा म्हणुन असलेली कीर्ती धुळीस मिळेल’ या विचाराने बळीने शुक्राचार्यांच्या म्हणण्याला समझुनही दानक्रिया चालु ठेवली. बळी राजा आपले म्हणणे ऐकत नाही हे पाहुन शुक्राचार्याने लघीमा या अष्ठसिद्धींपैकी एक सिद्धी वापरुन एका तोटीच्या आकाराचे रुप धारण केले आणि गुपचुप झारीच्या आत शिरुन थेट तोटीवर आतल्या बाजुला बसुन झारीचा मार्ग बंद केला (थोडक्यात, तोटी चॅाकअप केली…!) तत्कालीन रुढी परंपरा या फारच कटाक्षाने पाळल्या जात असल्याने बळी राजाने दानाची घोषणा केल्यावर स्वत:च्या घोषणीची औपचारीक सुरुवात करण्यासाठी (संकल्प सोडण्यासाठी) उजव्या हातात डाव्या हातातील झारीने जलाचे आचमण करण्याकरीता झारी वाकडी केली परंतु शुक्राचार्यांनी वाट अडवुन ठेवल्यामुळे आचमण झाले नाही. बटु अवतारातील वामनानेही आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले की, शुक्राचार्य झारीत लपुन बसल्यामुळे आचमन होत नाही. तेव्हा वामनाने बळीला झारीची तोटी तपासण्यास सांगितले. बळी राजाने बाजुला पडलेली एक गवताची काडी उचलुन तोटीत घुसवली. ती काटी थेट शुक्राचार्यांच्या डोळ्यात खुपसली गेली. प्राणांतिक वेदनांनी शुक्राचार्य लगेचच परत मुळरुपात आले. शुक्राचार्यांच्या या कृतीमुळे आपली आज अपकीर्ती झाली असती म्हणुन बळी राजा शुक्राचार्यांवर नाराज झाला. तेव्हा शुक्राचार्यही तुझी अधोगती सुरु झालेली आहे असे सांगुन दैत्यराज बळीच्या राज्याचा तसेच दैत्यगुरु या पदाचा त्याग करुन संज्ञास घेण्याकरीता निघुन गेले. आता कलियुगात झारीतील शुक्राचार्यांची संख्या वाढली आहे, असेच दिसते.
केंद्र शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि पोषण भी पढाई भी यांसारख्या महत्वाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. या योजनांसाठी आलेला लाखो रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च होत आहे ? , तो खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन, या भ्रष्टाचाराच्या मुळाशी असलेल्या झारीतील शुक्राचार्यांची कडक चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच अशा शुक्राचार्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महिला व बालकल्याण विभागात विविध साहित्यांच्या खरेदीची बोगस बिले सादर करून लाखो रुपयांचा निधी लाटल्याची सध्या चर्चा सुरू आहे. तसेच अंगणवाड्यांना साहित्य न पुरवताच, सेविकांकडून पावत्यांवर सह्या घेऊन निधी हडपला जातो, असेही काहीजनांकडून आरोप होत आहेत.शासकीय योजना सर्वसामान्यांच्या दारी, असे म्हटले जाते. परंतु तळागाळात म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत या योजनांचे अमृतकण पोहोचतील की नाही ? याबाबतही साशंकता आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि पोषण भी पढाई भी या योजना जिल्हयात योग्यरीत्या सुरू आहेत का, असाच प्रश्न सर्वसामान्य माणूस व्यक्त करीत आहे. जिल्हाधिकार्यांनी एकूण या प्रकरणी झारीतील शुक्राचार्यांना धडा शिकविण्याची गरज आहे, असे वाटते.