editorial article/16jan2025/thursday
मविआमध्ये एकवाक्यतेचा अभाव
शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर राजयातील आगामी नगरपालिकांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ राज्यातील महा विकास आघाडीत खळबळ माजली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसने याबाबतीत अजून निर्णय जाहीर केलेला नाही. प्रसारमाध्यमांकडून याबाबत सतत विचारणा होत आहे, परंतु मविआ आघाडीतील हे दोन पक्ष अस्पष्ट उत्तरे देत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या गडबडीत काँग्रेसमधील नेते दिसतात. काँग्रेसने राज्यातील महापालिका निवडणुकांत जिथे काँग्रेसची ताकद असेल तिथे स्वबळावर लढू आणि जिथे शक्य असेल तिथे आघाडी करू असे सावध उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसने अजून याबाबतची प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु शिवसेना ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर राज्यातील महा विकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले. तसेच राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीबाबत अशीच चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा नेमकी सुरू कोणी केली हेदेखील समजत नाही. इंडिया आघाडी असो वा राज्यातील मविआघाडी असो,दोन्ही आघाड्यांमधील पक्षांत एकवाक्यता नसल्याचे म्हटले गेले.
राज्यात महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत अपयशाला समोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीतील अपयशाची कारणे काय? याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. यातच आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्यामुळे महाविकास आघाडी तुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. जरी तर्कवितर्क लावले असले तरी, इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीपुरती होती, याला आता इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी पुष्टी दिली आहे. परंतु राज्याराज्यांत पुरोगामी पक्षांच्या आघाड्या आहेत, तिथे वेगळी परिस्थिति असू शकते. दिल्ली राज्यात आम आदमी पार्टीची ताकद आहे, तिथे आम आदमी पार्टीने काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे. काँग्रेसला वाटते, आम्ही राष्ट्रीय पक्ष असताना आम आदमी पक्षाने आमच्याशी आघाडी का केली नाही. तसेच मुंबई व इतर शहरांत महापालिका क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे, तिथे शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाने तसे जाहीर केले आहे.
ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या संकेतामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार ? काँग्रेसही या निवडणुका स्वबळावर लढणार की आघाडीत लढणार ? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सूचक विधान केले आहे. सतेज पाटील यांनी म्हटले आहे, शक्य असेल तिथे आघाडी करू, तसेच काँग्रेस म्हणून महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. राजकीय ताकद कमी झाल्यामुळे इतर पक्ष काँग्रेसला कमी लेखत आहेत. काँग्रेसला २०१४ पासून सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पक्षात एक प्रकारची उदासिनता आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी आता दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींनी राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीला गेले असल्याचे समजते. दिल्ली येथे राज्यातील काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच होऊ शकते. यासाठी कोंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, जिथे शक्य असेल तिथे म्हणजे एखाद्या जिल्ह्यात आघाडी करणे शक्य असेल तर आघाडी केली पाहिजे. कारण महायुतीचा पराभव होणे गरजेचे आहे. महायुतीच्या पराभवासाठी आम्ही काँग्रेस म्हणून जी पावले उचलली पाहिजे ती पावले काँग्रेस उचलेल. मग जिथे जिथे शक्य होईल तिथे आम्ही एकसंघपणे लढायला उतरणार आहोत. मात्र, पक्ष म्हणून आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आता आमच्यासाठी सर्वात महत्वाचे हे आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत आम्ही ताकदीने कसे लढता येईल? हे महत्वाचे आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका काय असेल? त्यामुळे मी म्हटले की, ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही आघाडी करणार आहोत, तसेच ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस म्हणून ताकदीने निवडणुका लढवू. कारण आमची लढाई ही महायुतीबरोबरची आहे. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत एकत्रित लढणे अपेक्षित आहे. तसेच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे किंवा नाही? यावर मी बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
महा विकास आघाडीतील काही पक्षांच्या स्वबळाची जोरात चर्चा होत आहे. महा विकास आघातल पक्षांनी आगामी महापालिकेच्या निवडणूका एकत्रित लढल्या तर त्याचा थेट फायदा महा विकास आघाडीला होऊ शकतो. परंतु सर्वजण वेगवेगळे लढण्याची भाषा करत असतील तर मवि आघाडीला यात म्हणावे असे यश येणार नाही, असे वाटते.