0.1 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

राजकारण्यांची शाब्दिक खडाजंगी

Editorial Article / 15 jan2025

शिर्डीमधील भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्राने संपवले असे म्हणत टीका केली होती. तसेच १९७८ पासून शरद पवारांचे दगाफटक्याचे राजकारण राज्यातील जनतेने २० फूट गाडले, अशी जहरी टीका केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा समाचार शरद पवारांनी घेतला आहे. आजवर देशात अनेक दिग्गज नेते होऊन गेले, पण कुणालाही तडीपार केले नव्हते, असा प्रतिटोला शरद पवारांनी अमित शाह यांना दिला आहे. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवते असं म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली आहे. अशाप्रकारे भाजप नेते व विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद यांनी म्हटले आहे की, देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसेच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. आपल्या शेजारचे राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावे घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नाही. आज त्या नेत्यांची मला आठवण होते आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजपाच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीत नुकतेच भाषण केले. भाषण करणे हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीबहुत माहिती घेऊन भाषण केले असते तर बारे झाले असते. अन्यथा लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. १९७८ चा संदर्भ देऊन अमित शाह यांना माझी आठवण झाली. १९७८ पासून मी राजकारणात काय केले त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.

त्यांना कदाचित माहीत नसेल १९७८ मध्ये म्हणजे ४० वर्षांपूर्वी अमित शाह नक्की कुठे माहीत नाही. १९७८ मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू आडवाणी असे जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ च्या पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगले योगदान दिले. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. हशू आडवाणी नगरविकास मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्ववान लोक माझ्या बरोबर काम करत होते, असा टोला शरद पवार यांनी लगावला. त्याचवेळी पवार यांनी म्हटले आहे की, भाजपाचे नेत्यांशी माझे संबंध होते, परंतु त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेत राजकारण केले नाही.

शरद पवार यांनी पुढे म्हटले आहे, त्यातून पवार व भाजपचे तत्कालीन नेते यांच्याशी कसे संबंध होते याचा प्रवास उलगडतो. पवार यांनी म्हटले आहे की, आणखी दोन नावे मी घेऊ इच्छितो, त्यांनी संघाची पार्श्वभूमी असताना आम्हाला सहकार्य केले. त्यात वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख मी करु इच्छितो. ही सगळी नेतृत्वाची फळी १९७८ आणि त्यानंतरच्या काळात दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगळे होते पण दोन वेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये संवाद होता. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची नावे घेता येतील. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केले नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात भूकंप, अतिवृष्टी या संकटांमध्ये काय केले पाहिजे त्यासाठी आपात्कालीन स्थितीत काय केले पाहिजे यावर चर्चा झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी माझे नाव आपात्कालीन स्थितीत काय करता येईल याबाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असे सुचवले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी मी विरोधी पक्षाचा असताना मंत्र्याचा दर्जा देऊन मला ते काम सोपवले होते. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहीत नसावी. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत जे उल्लेख झाले त्याबाबत एक मराठीत म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवते असे म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.

शरद पवारांनी पुढे म्हटले आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबाबतही त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही पाहिले. उद्धव ठाकरे हे त्याबाबत त्यांचे मत मांडतील. हे गृहस्थ जेव्हा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा मुंबईत आले, बाळासाहेबांच्या घरी ते गेले होते. या गृहस्थांना सहकार्य करावे अशी विनंती बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. यापेक्षा अधिकची माहिती उद्धव ठाकरे सांगतील असाही टोला शरद पवार यांनी लगावला. दुर्दैवाने पातळी घसरली किती ते सांगायला ही उदाहरणे पुरेशी आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्यांची नोंद त्यांच्या पक्षातही घेतली जाणार नाही असे मला वाटते असा टोलाही शरद पवारांनी लगावला. एकूण भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका चुकीची होती असे शरद पवारांचे म्हणणे आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही, याचा राज भाजप नेतृत्वामध्ये ठासून भरला आहे. त्या रागातूनच अमित शाह जेव्हा महाराष्ट्रात येतात त्यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवारांवर शरसंधान करतात असे दिसून येते. शरद पवार व उद्धव ठाकरे या दोघांच्या राजकीत पक्षांमध्ये भाजपने फुट पाडली असून आरोप – प्रत्यारोपांची लढाई अशीच काही काळ सुरू राहणार आहे असे दिसते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या