Nepal Flood :
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. आज (दि. ३० ऑगस्ट) दुपारी ३ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुरानंतर आतापर्यंत तब्बल ७८८ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. सर्वाधिक २६४ मृत्यू चितवन भागात झाले असून, नवलपरासी ईस्टमध्ये १९४, नवलपरासी वेस्टमध्ये १२०, गोर्खा ५८, नुवाकोट ५२, धाडिंग ५०, तनहुन ३७ आणि रसुवामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
२५०० पेक्षा अधिक नागरिक अद्याप गायब
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी’ने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, २५०२ नागरिक अद्याप बेपत्ता असून बाधित भागात वेगाने बचावमोहीम राबवली जात आहे. ओळख पटू न शकलेले मृतदेह देशभरातील २१ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.
जलविद्युत प्रकल्पांमधील ९३३ कर्मचारी अडकले
बेपत्ता नागरिकांमध्ये स्थानिक जलविद्युत प्रकल्पातील ९३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय ५९२ परदेशी नागरिक आणि परदेशी पर्यटकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिकही गायब आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या यादीत नेपाळ पोलीस, नेपाळ सैन्य, सशस्त्र पोलीस दल, सीमाशुल्क आणि इम्रिग्रेशन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील २३९ जखमींवर उपचार सुरू असून आपत्तीग्रस्त भागात सहा सर्जिकल वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे, त्रिशूली ३A हायड्रोपावर प्रोजेक्टच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांमध्येही प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.





