spot_img
spot_img
spot_img
spot_img

नगरपालिकांच्या निवडणुकीची उत्सुकता

नगरपालिकांच्या निवडणुकीची उत्सुकता

कृष्णाकाठ / अशोक सुतार

 

राज्य सरकारकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना नुकत्याच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारकडून नगरपालिकांना द्विसदस्यीय, तर नगरपंचायतींसाठी एकसदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला आहे. राज्यातील सत्ताबदल, ओबीसी आरक्षण व अन्य काही कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडल्या गेल्या. प्रभागरचना, फेर आरक्षण काढूनही या निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आगामी चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला आता गती आली आहे आणि इच्छुक उमेडार सज्ज झाले आहेत, असे दिसते. राज्य सरकारने महानगरपालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश दिले असून, तशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

राज्य सरकारला निवडणूक आयोगाच्या मान्यतेनेच प्रभागरचना करावी लागणार असून, याचे अधिकार सर्वस्वी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचना तयार करणे, ती निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठविणे, प्रारूप प्रभागरचनेस मान्यता देणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभागरचना निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठविणे. यानंतर अंतिम प्रभागरचनेस मान्यता देऊन ती प्रसिद्ध करणे असे प्रभागरचनेचे टप्पे असणार आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच हा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे एकूण चार टप्पे असतात. पहिला प्रभागरचनेचा, त्यानंतर आरक्षण सोडतीचा, तिसरा मतदार याद्या आणि चौथा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे होय. हे चारही टप्पे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला सुमारे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. असे असले तरी प्रभागरचनेच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार अधिकृतरित्या जाहीर करणार असून विविध पक्ष व आघाड्या आणि पॅनल यांनी राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रमांना भेटी देणे, प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेणे अशा प्रक्रियेला राजकारण्यांकडून   वेग येऊ शकतो. तसेच नगरपालिकेत बराच काळ प्रशासक राज असल्याने इच्छुक उमेदवार किंवा निवडून आलेले नगरसेवक नाराज आहेत, त्यांनी पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

प्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेउन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजे. प्रभागरचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतो नवविभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रभागरचना करताना प्रगणक गट फोडू नये, असे सरकारी आदेशात नमूद आहे.

जिल्ह्यातील मलकापूर पालिका व मेढा नगरपंचायत वगळता अन्य पालिकांनी प्रभागरचना व ओबीसी आरक्षण २०२२ साली निश्चित केले आहे. त्यामुळे नगरपालिकांकडे प्रभागरचनेचा संपूर्ण डेटा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने जर पूर्वीची प्रभागरचना कायम ठेवली तर पालिकांमधील फक्त आरक्षण बदलू शकेल. याबाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सातारा नगरपालिकेत २५ प्रभाग असून ५० सदस्यसंख्या आहे. कराड नगरपालिकेत १४ प्रभाग असून २९ सदस्यसंख्या आहे. फलटण : १३ प्रभाग – २७ सदस्यसंख्या,वाई :  ८ प्रभाग  – २० सदस्यसंख्या, मलकापूर नगरपरिषदेत ९ प्रभाग असून १९ सदस्यसंख्या आहे. महाबळेश्वर: १० प्रभाग – २० सदस्यसंख्या, पाचगणी:  ८ प्रभाग – १७ सदस्यसंख्या, रहिमतपूर : १० प्रभाग – २० सदस्यसंख्या, म्हसवड : १० प्रभाग – २० सदस्यसंख्या, मेढा (नगरपंचायत) : १७ प्रभाग – १७ सदस्यसंख्या असे सातारा जिल्ह्यात एकूण १२४ प्रभाग, २३९ सदस्यसंख्या आहे.

नगरपालिका निवडणूक जवळ आल्याने अनेक ठिकाणी समाजकार्य करणार्‍यांचे फलक लागलेले दिसत आहेत. काही जण निमित्त काढून नागरिकांना भेटायला जात आहेत. तसेच वाढदिवस, पूजा इ. कार्यक्रमांना शहरातील नेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. लोकांना भेटायच्या निमित्ताने राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांचा सुकाळ झाला आहे. यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळवायचेच या हेतूने अनेक जण सोशल मीडियावर भलतेच सक्रीय झाल्याचे दिसत आहे. शहरातील रस्त्यांची कामे सुरू झाली की समजायचे, निवडणूक जवळ आली आहे. तसेच काहीजण प्रभागारचना कशाप्रकारे बदलली तर काय राजकीय खेळी करायची या विचारांत दंग आहेत. निवडणूक आली की, नेते व कार्यकर्त्यांचा सुकाळ होतो आणि ते सक्रीय होतात असे दिसू लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या