असे सांगून तेजस ठाकरे झाले कोल्हापुरला रवाना
शिराळा/प्रतिनिधीः-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी दोन दिवस चांदोली व्याघ्र प्रकल्प,चांदोली धरण परिसरात नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला.त्यांची ही खाजगी भेट होती त्यामुळे याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. पावसामुळे त्यांना अनेक ठिकाणी जाता आले नाही त्यामुळे मी पुन्हा येईन असे सांगून मंगळवार दि.17 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कोल्हापूर कडे रवाना झाले.
मणदूर – जाधववाडी (ता.शिराळा)येथील रविवार दि.15रोजी तेजस ठाकरे तसेच त्यांच्याबरोबर दहा ते बारा ट्रेकिंग ग्रुप चे सदस्य,त्यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्थेसह चांदोली रिसॉर्ट येथे आले होते.यावेळी श्रेयस पाटील, सुनील चव्हाण, डॉ.अतुल मोरे, व्यवस्थापक किरण परदेशी यांनी याठिकाणी व्यवस्था केली होती.ठाकरे फाउंडेशन माध्यमातून जंगल व व्याघ्र प्रकल्प याचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते.
त्यांनी त्यांच्या या दौर्यात चांदोली धरण, अभयारण्य, उदगीरी, कांडवन, अंबाईवाडा, खुंदलापूर आदी ठिकाणी भेटी दिल्या.त्यांनी अनेक क्षण फोटोग्राफी ने टिपले.उदगिरी येथील देवस्थानाला भेट देऊन तेथील संपूर्ण परिसराची माहिती घेतली.पावसाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना अभयारण्यातील अनेक ठिकाणी जाता आले नाही.रात्रीही ही त्यांनी मुक्काम केलेल्या परिसरात निसर्ग सौंदर्य पाहिले.
याठिकाणी आपण अनेक ठिकाणांना भेटी दिल्या,येथील निसर्ग सौंदर्य खूप छान व सुंदर आहे. यावेळी पावसामुळे आपण सर्व ठिकाणे पाहू शकलो नाही त्यामुळे पुन्हा येईन असे सांगून ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळाना भेटी देण्यासाठी बाहेर पडले.