श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर
कोल्हापूर-कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53 वर्षे) यांचे गुरुवार, दि. 30 एप्रिल रोजी अल्प्शा आजाराने दु:खद निधन झाले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्या नात होत्या. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या परिसरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शुक्रवार, दि. 1 मे रोजी सकाळी 9 ते सकाळी 11 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी शुक्रवार, दि. 1 मे रोजी दुपारी 12 वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहे. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी देशातील, राज्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक इत्यादी विविध क्षेत्रातील मान्य्वर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी 1954 साली स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सन 2008 पासून सलग 18 वर्षे सचिवा म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळला. संस्थेच्या सुमारे 410 संस्कार केंद्रातून त्यांच्या सचिवा पदाच्या प्रशासकीय कालावधीत त्यांच्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल करण्यासाठी त्यांनी नवनवीन योजना संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबविल्या. इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, आर्टिफिशीयल इंटिलिजन्स्, लॉ कॉलेज या शाखांचा शुभारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी संस्थेच्या विविध शाखांना गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य्, नृत्य्, नाटय्, कला, संगीत आणि इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, जर्मन भाषांच्या विकासासाठी महत्व्पूर्ण योगदान दिले. त्यांचे शिक्षणविषयक विचार समाजाच्या प्रबोधन विकासासाठी मार्गदर्शक आहेत.
त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका, प्राचार्या व सेक्रेटरी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, राज्य शासनाच्या तेजस्विनी महिला आश्रमामध्ये शिक्षणतज्ज्ञ व महिला कल्याण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांना आदर्श महिला पुरस्कार, राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार, आधुनिक सावित्री पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सेमीनारमध्ये आपले शैक्षणिक विचारांसोबत कृतीशील आराखडा सादर केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, पती, दोन मुले, सासू, सुन असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार, दि. 2 मे रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.





