Krushnakath / date: 28march2025/ Ashok Sutar
अंधश्रद्धा, जादूटोणा वगैरे …
अजूनही समाजात अंधश्रद्धा, जादूटोणा या विषयाला महत्व दिले जात आहे. आज विज्ञानयुगात वावरणार्या मानवाने अंधश्रद्धा का बाळगावी ? यामागे मनाचा कमकुवतपणा उघड होत आहे. काही बाबा बुवा जादूटोणा करून अडाणी तसेच शिकलेल्या लोकांना भजनी लावतात. लोक चमत्काराला नमस्कार करतात, हे खरे आहे. परंतु हा चमत्कार नेमका कुठून येतो ? चमत्कार म्हणजे अचानक वातावरणात काही दिव्य झाले आणि जागाच बदलून गेले असे नाही. रघुवीर जादूगारांनी एकदा ताजमहाल अदृश्य केला होता. परंतु ताजमहाल कायमचा अदृश्य झाला नाही आणि होणेही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. ताजमहाल बघणार्या लोकांना एक मानसिक संदेश दिला गेला की, ताजमहाल आता दिसत नाही. हिप्नोटिझम म्हणजे वशीकरण केले गेले होते. यालाच नजरबंदीचा खेळ असे म्हटले जाते. जगात जादू वगैरे काही नसते, तो एक आभास असू शकतो. ज्याचे मन सशक्त असेल अशा माणसाला कुठलीही गोष्ट भ्रमात पाडू शकत नाही. म्हणुनच स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे की, जेव्हा एखादी कल्पना केवळ मनावर व्यापते तेव्हा ती प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक अवस्थेत रूपांतरित होते. अनुभव हाच एकमेव गुरू आहे. आपण आयुष्यभर बोलू शकतो आणि तर्क करू शकतो, परंतु जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा एकही शब्द समजणार नाही. समाजात अज्ञानामुळे लोक अंधश्रद्धा, परंपरा यांना आपले जगण्याचे शास्त्र, परंपरा समजतात. परंतु तसे नाही. आपण मानसिक सक्षम होण्यासाठी काही केले तरच तुम्ही सत्य शोधू शकता अन्यथा तुम्ही दुर्बल होऊन दुसर्यावर अवलांबून राहाल.
विज्ञानाच्या शोधामुळे मायाजाळाच्या जगात वावरत असताना इस्लामपुरात (ता. वाळवा जि. सांगली) एका महिलेच्या दारात करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बकऱ्याचे मुंडके, पाय दोरीने बांधून दारात अघोरी पूजा करण्यात आली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी सर्व साहित्य पोत्यात भरुन पोलिसांच्या हवाली केले. इस्लामपूर येथील ऊरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचे प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबीय, लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांमधील भीतीचे वातावरण दूर केले. लोक करणी, जादूटोणा या गोष्टींना घाबरतात, हे माहीत असल्यानेच त्यांना घाबरवण्यासाठी असे प्रकार सर्रास केले जातात. तसेच काही इस्लामपूर येथे घडले. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अशा वाईट प्रवृत्तीला रोखले, हे चांगलेच झाले. परंतु लोकांमध्ये शहाणपण आणायचे कुठून ? हा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
इस्लामपूर शहरातील उरूण भागात एका महिलेच्या दारात जादूटोणा, करणीचे साहित्य आढळले. त्यांच्यात बकर्याचे मुंडके, चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते. त्यावर लिंबू सुया व टाचण्या टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही टाचण्या टोचलेले समोर ठेवलेले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची फांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी, कुंकू, गुलाल त्यावर टाकलेला होता. परिसरात सर्व सामान्य लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरलेले होते. खेडेगावात आणि शहरातही लोक अंधश्रद्धा आणि करणीच्या प्रकारला लोक वचकून असतात अनेक जण शिकायचे असतात म्हणून शकलेले म्हणजे सुशिक्षित असतात. परंतु त्यांच्यातही अंधश्रद्धा भरलेली असते. ते चौकस नसतात, त्यांना कुठला प्रश्न पडत नाही. असे म्हणतात की, न्यूटन जर भारतात जन्मला असता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नसता. याचे कारण भारतीय लोकांच्या मानसिकतेमध्ये दडलेले आहे. भारतीय लोक सफरचंद झाडावरून का पडले, याचे कारण शोधणार नाहीत. कारण शोधले नाही तर उत्तर मिळणार नाही. परंतु न्यूटनने सफरचंद झाडावरून का पडले याचा सखोल शोध घेतला. अन्यथा, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नसता.
कुणी तरी करणी केली हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. करणी करण्यात आल्याची घटना इस्लामपुरात घडल्याचे समजताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जादूटोण्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले, त्यांचे प्रबोधन केले. अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही. आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत त्यामुळे अशा अघोरी , अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे. करणी ,जादूटोणा करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्या वर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असे सांगत भयभीत झालेल्यांचे प्रबोधन केले.महिलेच्या दारातील सर्व साहित्य बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटनेची तक्रार घरातील महिलेने अज्ञाताविरोधात पोलिसांकडे केली आहे. असाच अघोरी पूजेचा प्रकार कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणुन भोंदू बाबाला पोलिसांच्या हवाली केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केला म्हणून लोक अंधश्रद्धेपासून वाचले, हे खरे आहे.