कृष्णाकाठ / दि. २५ एप्रिल २०२५ / अशोक सुतार
सावित्रीबाईंचे नायगावातील स्मारक
सावित्रीबाई जोतीराव फुले यांची पुण्यतिथी मागील महिन्यात १० मार्च रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी देशातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. अशा या नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजारांच्या निधीस राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सावित्रीबाई फुलेंचे यथोचित स्मारक नायगावमध्ये उभारले पाहिजे, त्यामुळे त्यांचे कार्य नव्या पिढीला माहीत होईल.
नायगाव येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तत्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली होती. मंत्री जयकुमार गोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२. ६० कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७. १७ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.
राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी गेली कित्येक वर्षे मी प्रयत्नशील होतो. मागच्या सरकारमध्येही मी सातत्याने हा विषय लावून धरला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नायगाव येथे झालेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यात या मागणीचा आम्ही पुनर्उच्चार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाला भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यावधींचा निधी स्मारक व प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सावित्रीबाईंचे स्मारक नायगावात होईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे हे स्मारक त्यांच्या समाज कार्याला अभिवादन ठरणार आहे. स्मारकाच्या जागेत भव्य पुस्तकांचे दालन उभे राहावे, मुलींना अभ्यासासाठी तिथे योग्य वातावरण हवे, सावित्रीबाई फुले यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत अशी अपेक्षा आहे.तसेच सोबतच उभे राहणारे महिला प्रशिक्षण केंद्र या परिसरातील महिलांसाठी सबलीकरणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महिला प्रशिक्षण केंद्राचे दीर्घकालीन व्यवस्थापन, प्रशासन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव असून सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
दि. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.