अग्रलेख / दि. 21 मार्च 2025
दिशा सालियनचे प्रकरण
पाच वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत राजपूतने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सुशांत दूरचित्र वाहिन्यांवरील विविध मालिकांत काम करणारा अभिनेता होता. त्याने काही चित्रपटांतही काम केले होते. सुशांतच्या आत्महत्येने बॉलीवूड आणि भारतात खळबळ माजली होती. दिशा सालियन ही बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत राजपूतची मॅनेजर म्हणून कार्यरत होती. दि. ८ जून २०२० रोजी दिशा सालीयनने अचानकरीत्या आत्महत्या केली. मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. काही राजकीय नेत्यांनी याप्रकरणी शिवसेना ठाकरे पक्षा प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. दिशाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून दिशाचे वडील सतीश सालियन यांनी जून २०२० मध्ये दिशाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता, आताही त्यांनी हाच संशय व्यक्त केल्यामुळे सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वी दिशाची हत्या आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप फेटाळणारे सतीश सालियन आता दिशाची हत्या झाल्याचे आरोप करत आहेत. ऐन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडीत गाठण्याचा सत्ताधारी पक्षाचा डाव दिसत आहे. किंवा कोणते तरी प्रकरण पुन्हा उकरून काढून राज्यात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न काही जणांचा दिसत आहे.
दिशा सालियनच्या महाविद्यालयीन मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर दिशा सालियनने आत्महत्या केली त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता. दि. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनच्या घरात तिचे मित्र आणि प्रियकर पार्टी करीत होते. ही माहिती इंडिया टूडेने दिली आहे. त्या रात्री पार्टीत दिशाने मद्यप्राशन केले होते. माझी कुणी काळजी करीत नाही, असे दिशा वारंवार मित्रांना म्हणत होती. करियरला घेऊन ती निराश दिसत होती. त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला. थोड्या वेळाने मित्रांनी दरवाजा ठोठावला. परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचे दिसून आले. मित्रांनी इमारतीखाली जाऊन तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी दिशाला मृत म्हणून घोषित केले. सदर घटनाक्रम उपस्थित असलेल्या दिशाच्या मित्राने एका व्हाटसअप ग्रूपवर शेअर केला होता. पोलिसांनी चौकशी करताच त्यांना त्यात तथ्य आढळले होते.
बॉलीवूड अभिनेता सुशांत राजपूतच्या १३ जून २०२० च्या आत्महत्येनंतर दिशा सालियन व सुशांतच्या मृत्युचा संबंध जोडला गेला आणि राजकीय नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू झाले. भाजपा नेते नारायण राणे यांनी, दिशावर बलात्कार करून तिचा खून झाल्याचा आरोप केला. दिशाने तिचावर झालेला अत्याचार सुशांत राजपूतला सांगितला होता. त्यानंतर सुशांत राजपूतला धमक्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर काही राजकीय व्यक्तींची नावे या प्रकरणात आणली गेली. सुशांत राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्यांची चर्चा देशभर झाली. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. २०२१ साली पोलिसांनी, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्यात कोणत्याही प्रकारची संशयास्पद परिस्थिती आढळली नसल्याचे म्हटले होते. डिसेंबर २०२३ मध्ये राज्य सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एसआयटीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला मिळालेला नाही. मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर म्हटले आहे की, दिशा रहात असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्हींच्या कॅमेर्याची तपासणी केली असता त्यात संशयास्पद परिस्थिती आढळली नाही. ज्यादिवशी दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी दिशा फक्त एकदाच इमारतीच्या बाहेर आली होती. तिचे पार्सल घेण्यासाठी ती इमारतीखाली आली होती. दिशा गर्भवती असल्याचा मुद्दा पोलिसांच्या उत्तरीय तपासणीमध्ये फेटाळून लावला होता.
दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय पटलावर वातावरण गरम झाले आहे. पाच वर्षांपूर्वीचे प्रकरण उकरून काढून काही नेत्यांना अडचणीत आणण्याचा डाव शिजत आहे. विशेष म्हणजे दिशा सालियन प्रकरणाचा तपास झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा डोके वर काढीत आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करणार असल्याचे दिसते. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाचा घातपात झाल्याचा संशय पुन्हा व्यक्त केल्याने दिशाच्या तपासाला नव्याने गती मिळणार आहे, असे दिसते. दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी दिशाच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडून व्हावा, अशी मागणी केली आहे.
दिशाच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचे नाव असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार, ८ जून २०२० च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोरिया दाखल झाले आणि त्या पार्टीचा मूड बदलला. या घटनेनंतर दिशाचे राहणे अनेकांना त्रासात टाकणारे होते म्हणून तिला कायमचे शांत करण्यात आले, असे सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला.
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या दिवशी आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा आरोप सातत्याने होत आहे. मात्र यावर २०२२ मध्ये आदित्य ठाकरेंनी, दिशाचा मृत्यू झाला, त्यावेळी आपण आजोबा (रश्मी ठाकरे यांचे वडील) आजारी असल्याने रुग्णालयात होतो, असे म्हटले होते. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरेंनी म्हटले होते. तसेच आत्ताही आपण न्यायालयात जे बोलायचे ते बोलू असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.